Sunday, September 16, 2007

राधा ही बावरी

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !



हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना

चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना

हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई

हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !



आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती

तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती

हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई

हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही

त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -

राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

अताशा असे हे मला काय होते......

Get this widget | Share | Track details

अताशा असे हे मला काय होते

कोण्याकाळचे पाणी डोळ्यात येते

बरा बोलता बोलता स्तब्ध होतो

कशी शांतता शून्य शब्दात येतो॥१॥

कधी दाटू येता पसारा घनांचा

कसा सावळा रंग होतो मनाचा

असे हालते पात हळुवार काही

जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्यांचा॥२॥

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा

क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा

नभातून रोज जातो बूडूनी

नभाशीच त्या मागू जातो किनारा॥३॥

न अंदाज कुठले न अवधान काही

कुठे जायचे त्ययाचे भान नाही

जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात

न कुठले नकाशे न अनुमान काही॥४॥

कशी ही अवस्था कुणाला कळावी

कुणाला पुसावे, कुणी उत्तरावे

किती खोल जातो तरी तोल जातो

असा तोल जाता कुणी सावरवे॥५॥

अताशा असे हे मला काय होते......

Saturday, September 15, 2007

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी....


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

Sunday, September 9, 2007

आठवतो तो नदी किनारा..........


आठवतो तो नदी किनारा जिथे
तू मला भेटायला यायचीस
तू मला मिठीत घ्यायचीस

आठवतो तो नदी किनारा जिथे
हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो नदी किनारा जिथे
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो नदी किनारा जिथे
वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या घराची
वीट मात्र ढासळली नाही..........

मोजके मराठी.....











Friday, September 7, 2007

Sunday, September 2, 2007

म्हणालो नाही......

Saturday, September 1, 2007

एक, अनेक आणि एकता

जाणीव.......

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नळाखाली हात धरुनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत..तिखट-मीठ लावलेल्या
चिंचा-बोरं-पेरू-काकडी सगळं खायचय,
सायकलच्या चाकाला स्टंप धरुन
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करुन
सायकलची रेस लावुनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधुन निघुन बाहेर पळायचय,
ती पळुन जायची मजा अनुभवायला ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय,
आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असू दे.. जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझं पाठिवर वागवायचय,
कितीही उकडत असू दे.. वातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडुन बसायचय,
कितीही तुटका असू दे... ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय,
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

काही नवे वाहतुकीचे नियम......

आपल्याला Learning Liscence काढताना वाहतुकीच्या चिन्हांबद्दल जे काही प्रश्न विचारले जातात ना त्या यादी मधे नसलेले पण पुण्यात गाडी चालवायला अतिशय आवश्यक असे काही वाहतुकीचे नियम इथे लिहायचा विचार आहे. या नियमांसाठी आवश्यक चिन्हे नेहेमिप्रमाणे लाल-पांढर्या रंगाच्या फलकावर न दिसता आजुबाजुच्या रहदारीतच त्यांची "लक्षणं" दिसतील हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.

नियमाचे नाव - Landing Gears
लक्षण - साडी नेसलेल्या काकू Kinetic Honda, Honda Activa यासारख्या एखाद्या वाहनावरुन तुमच्या पासुन १० फुटाच्या पट्ट्यात चालल्या आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि त्या काकू अद्रुश्य होइपर्यंत जागचे हलु नका.
विशेष दंडपात्र गुन्हा - काकुंना overtake करण्याचा प्रयत्न करणे, त्याना side मागण्यासाठी horn वाजवणे इ.
संदर्भासह स्पष्टीकरण - विमान land होताना त्याचे Landing Gears जसे बाहेर येतात तसे गाडी चालवताना काकुंचे दोन्ही पाय गाडीच्या बाजुला येउन जमीनीला घासत असतात, आणि तशाच अवस्थेत त्या ४०-५० कि.मी. प्रति तास या वेगाने त्या गाडी चालवत असतात. जवळपास एखादा चौक असल्यास त्यांनी केलेल्या हातवार्यांवरुन त्या ज्या दिशेला जातील असं वाटत असेल त्या दिशेला त्या जातीलंच असं नाही. मी एकदा दुपारी एका रिकाम्या रस्त्यावरुन जात असताना अशाच एका काकुंनी चौकात आल्यावर डाविकडला indicator दिला, उजवीकडे हात दाखवला आणि त्या सरळ निघुन गेल्या !!!!!!!!!!
त्यांना overtake करायला तुम्ही speed वाढवायला आणि रस्त्याच्या बाजुला असलेल्या हातगाडीवरची भाजी बघुन "अय्या! किती छान रताळी" असं म्हणत मागचा-पुढचा (विशेषतः मागचा) काहीही विचार न करता त्यांनी ब्रेक दाबायला एकच वेळ असू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्यांना side मागायला horn वगैरे वाजवलात तर त्या आवाजाने दचकुन त्या आपल्याच गाडिवर पडतात. "kinetic वरच्या काकू" यापेक्षा धोकादायक गोष्ट पुण्याच्या रस्त्यावर शोधुन सापडणार नाही (नाही... मोटारसायकल वरील मुलगी देखील नाही)

नियमाचे नाव - Godzilla
लक्षण - एखादी मुलगी Indigo, Esteem, Scorpio (!!) यासारख्या एखाद्या मोठ्या वाहनातुन तुमच्या पासुन १०० फुटाच्या पट्ट्यात चालली आहे.
नियम - Godzilla अथवा King Kong यासारख्या सिनेमात त्या महाकाय प्राण्याला पाहिल्यावर लोक जसे पळत सुटतात तसा आपला जीव मुठीत धरुन वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत सुटा. (पळताना माफक प्रमाणात आरडा-ओरडा केलात तरी चालेल.) ती गाडी कधी, कशी, कोणाच्या अंगावर येइल काही सांगता येत नाही.
विशेष दंडपात्र गुन्हा - ती मुलगी जर आपल्या वाहनाच्या मागे असेल आणि horn वगैरे वाजवत असेल तर ताबडतोब side द्या आणि "आज आपल्याला शिर सलामत तो पगडी पचास किंवा जान बची तो लाखो पाये... अशा म्हणींचा प्रत्यय आला" अशी मनाची समजुत घालुन घ्या.

नियमाचे नाव - आजोबा crossing
लक्षण - ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आजोबा तुमच्या समोर रस्ता cross करत आहेत.
नियम - ताबडतोब जागच्या जागी थांबा आणि एखाद्या सुजाण नागरिकाप्रमाणे आपल्या मागुन येणार्या लोकांना देखिल ओरडुन ... नाहितर वेड्यासारखे हातवारे करुन संभाव्य धोक्याची जाणिव करुन द्या. कारण आजोबांना जर रस्ता cross करायची लहर आली तर ते " मला आता रस्ता cross करायचा आहे आणि तो मी करणारच" या दृढनिश्चयाने ते आपले दोन्ही हात उंचावुन रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या वाहनांना " थांबा" असा इशारा करुन बाकी कसलिही पर्वा न करता चालायला लागतात .. मग त्या निश्चयापुढे आपल्यासारख्या " आज दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा/क़ॉफी प्यायची नाही" असला साधा निश्चय पाळता न येणार्या पामरांची काय कथा?
विशेष दंडपात्र गुन्हा -गाडी आजोबांच्या फार जवळ नेऊन थांबवणे. असे केल्यास किमान अर्धा तास रस्त्याच्या कडेला रणरणत्या उन्हात उभे राहुन " आजच्या पिढीचं काय चुकतं" या विषयावरिल व्याख्यान ऐकण्याची तयारी ठेवा.

सध्या एवढ्या नियमांचे नीट पालन करा. दुरदर्शन वर सांगतात ते लक्षात ठेवा ..... " मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" , " गाडी नीट चालवा, घरी कोणितरी तुमची वाट पाहत आहे" " दुर्घटनासे देर भली" इत्यादी.

आपलाच एक शुभचिंतक (आणि समदुःखी वाहनचालक)

ती ५ मिनीटं !


"हो!! उठतोय, फक्त ५ मिनीट झोपू दे"

हे माझं रोज झोपेतुन उठतानाचं पेटंट वाक्यं. अगदी लहानपणापासुनचं. त्या शेवटच्या ५ मिनीटांच्या झोपेसाठी मी खुप पुर्वीपासुन झगडत आलो आहे. खरं तर या ५ मिनीटांच्या झोपेवरुनच तुमची झोप पूर्ण होते का नाही ते ठरत असतं. आदल्या रात्री तुम्ही किती वेळ झोपता याशी त्याचा काही संबंध नाही. तुम्ही ४ तास झोपा नाहीतर १०, झोप पूर्ण की अपूर्ण ते या ५ मिनीटानी ठरतं. ही ५ मिनीटांची झोप पुरणपोळीवर घेतलेल्या तुपासारखी असते, पुरणपोळी कितीही चांगली झाली तरी त्याची चव तुपाशिवाय अपूर्णच, किंबहुनी तुपाशिवाय खाल्ली तर पोळी बाधतेच.

ही ५ मिनीटं तुम्हाला मिळाली तर त्या दिवसा सारखा शुभदिवस कुठला नाही. दिवसभर तुमचा मुड प्रसन्न राहतो, सारखं एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं, सगळ्यांशी (हो! बॉसशी सुद्धा) चांगलं बोलावं आणि वागावसं वाटतं, रस्त्यावरुन जातांना तो ओलांडू पाहणार्या आजींना मदत केली जाते, अहो एवढंच कशाला ? चालता चालता गुणगुणत असलेल्या गाण्यावर एखादी मस्त dance step आपल्याला कधी जमुन जाते हे कळत पण नाही. थोडक्यात म्हणजे एखाद्या "super fresh" टुथपेस्टच्या जाहिरातितल्या व्यक्तिसारखा आपला दिवस जातो. आता अशा दिवसांचे फायदे किती आहेत बघा. आपला मुड चांगला असल्यामुळे खाणं-पिणं छान असतं,त्यामुळे तब्येत चांगली राहते... अगदी बी.पी. का काय म्हणतात ते पण नॉर्मल राहतं, गुणगुणण्यामुळे गाण्याचा रियाज होतो. बॉसशी चांगलं वागल्यामुळे promotion चे चान्सेस वाढतात. आजींना मदत केल्याबद्दल थोडं पुण्य पदरात पडतं. थोडक्यात प्रगतिच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते.

याविरुद्ध जर ही ५ मिनीटं आपल्याला मिळाली नाही तर आपण दिवसभर चिडचिड करत असतो. रस्त्यावरुन जाताना कोणी मधे आलं तर त्याच्या अंगावर खेकसतो आणि त्याचे शिव्याशाप पदरात पाडुन घेतो. ऑफिसात बॉसशी भांडण करुन आपल्याच पायावर धोंडा पाडुन घेतो. अशा दिवशी साधा ताकभात खाल्ला तरी तो घशाशी येउन acidity होते.

आता हे पाहिल्यावर प्रगतिचा मूलमंत्र का काय तो सापडला असं तुम्हाला वाटेल. पण हे सगळं इतकं सोपं असतं तर ना!
कुठलीही चांगली गोष्ट सांगितली की त्याचे विरोधक तयारच असतात. लोकांचं (विशेषतः आयांचं) या ५ मिनीटांशी इतकं वाकडं का असतं काय माहित. काही लोक त्याला उगाचच मनोनिग्रहाचे मापदंड लावतात. "५ वाजता ठरलं म्हणजे ५ वाजताच उठायचं, ५ वाजुन ५ मिनीटांनी नाही" असले काहीतरी अघोरी विचार असतात त्यांचे. आणि ५ ला म्हणजे ५ लाच उठुन हे करतात काय? तर कुठे टेकड्याच चढ. नाहीतर सगळे एका ठिकाणी जमुन वेगवेगळ्या स्वरात हसतंच बस वगैरे वगैरे. अरे छान अजुन थोडा वेळ लोळावं, घरी दात न घासता पण चहा मिळत असेल तर तो प्यावा, सकाळचा एखादा (इतरांनी गायलेला) राग ऐकावा. कशाला जीवाला एवढे कष्ट?

आयांचं वेगळंच काहीतरी असतं. त्यांनी मारलेल्या पहिल्या हाकेत आपण उठलो नाही तर तो त्यांना त्यांचा नैतिक पराभव वाटतो. मग चिडुन त्या आपल्याला उठवतातच. सुटीच्या दिवशी "आत्ता उठ, नंतर दुपारी हवा तेवढा वेळ झोप" असलं काहीतरी बिनबुडाचं विधान करतात. अरे! दुपारी कसलं झोप? "जो बुंद से गयी हौद से नही आती! " अशी म्हण मला फेकाविशी वाटते. पण तो पहिला "जोSS" म्हणताना मला मोठ्ठी जांभई येते आणि त्याचा फायदा घेउन आई तिथुन निघुन जाते. कसं आहे, ५ मिनिटांची किंमत काय आहे हे ती ५ मिनीटं कधीची आहेत यावर अवलंबुन असतं. कडकडुन भुक लागलेली असतांना जेवण मिळण्यासाठी लागलेली ५ मिनीट आणि आवडीचं पोटभर जेवण झाल्यावर थोडीशी पण हालचाल न करता जाणारी ५ मिनीट यात काही फरक आहे का नाही?

असो! कधी ही ५ मिनीटं मिळतात तर कधी नाही. त्यांच्यासाठी रोजचा होणारा झगडा ही पण त्यातलीच मजा. कधी आपण झोपावं आणि कधी आईला आपल्याला उठवल्याचं समाधान मिळू द्यावं ... तिनं केलेली दुधीभोपळ्याची भाजी आवडत नसतांनाही आपण खातो कारण उरलेल्या अर्ध्या भोपळ्याचा उद्या ती हलवा करणार असते ... तसं.

Sunday, August 19, 2007

तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

मटण कैसा किलो ? मटण कैसा किलो ? हाताची दाही बोटे मटणवाल्यापुढे सतत नाचवत भाउंनी विचारले. दाही बोटात चांगल्या सोन्याच्या घसघसीत अंगठया होत्या. या वैभवाच्या अती प्रदर्शनाने दुकानदार चांगलाच वैतागला.

मटण सौ रुपय्या किलो, सौ रुपय्या किलो, आपली संपुर्ण बत्तीसी विस्कारुन, दुकानदाराने भाव सांगितला. त्याचे बत्तीस ही दात सोन्याचे होते. झाले दोघांची लग्गालग्गी, गुद्दादुद्दी सुरु झाली. भांडण सरपंच बाई पर्यंत पोहोचले. दोघांचे म्हणणे ऐकल्या नंतर बाईंनी आपला फैसला सुनावला.

मान उजवीकडे वळवुन भाऊरावांकडे बघुन त्या म्हणाल्या तुम्हारा ही बराबर. मग हळुवारपणे मान डावी कडे वळवुन मटणवाल्याला म्हणल्या तुम्हाराभी बराबर.

सरपंचबाईच्या कानात भल्यामोठाल्या हिऱ्याच्या कुडी होत्या.

सध्या महाराष्टात दोन राजकीय पक्षातील युती तोडण्या / रहाण्या वरुन होण्याऱ्या कुरबुरीवरुन ,युक्तीवादाबद्द्ल ही असेच म्हणावेसे वाटते. तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

आम्हांस आलेले (प्रेम)पत्रक...


माझ्या खवचट खेचरा,
गेले चार-पाच दिवस तू कोठे उलथला होतास? माझा फोनही घेत नव्हतास! स्वतःला उद्धव ठाकरे समजतोस की काय? लक्षात ठेव, आपली युती अशी नाही तोडू देणार मी! गेल्याच महिन्यात वडाच्या फांदीला फेऱ्या मारून तुला सात जन्म मागून घेतला आहे. या महिन्यातही बरीच व्रते-उद्यापने, उपासतापास येतात. ते "सकाळ'मध्ये साग्रसंगीत येईलच. त्यानुसार सर्व काही यथासांग करण्याचे मी ठरविलेच आहे. तेव्हा तुझी सुटका नाही!!
माझ्या उचलखोर उचापत्या, "सकाळ'मध्ये यंदा श्रावण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहेत. तेव्हा "सकाळ'वाले "व्रत'स्थ महिलांचे, मंगळागौर जागविणाऱ्या भगिनींचे, उपवास करणाऱ्या पुरंध्रींचे फोटो छापणार आहेत काय, याचीही जरा चौकशी करून ठेव. छापणार असतील, तर नऊवारी साडीची सोय आताच करून ठेवलेली बरी. तुला आठवते? गेल्यावर्षी आपण दोघे मिळून अख्खे हिंदमाता फिरलो, तरी नऊवारी मिळाली नव्हती. तेव्हा मटामध्ये फोटो छापून येत होते! यंदा तरी तू माझा फोटो पेपरात छापून आणणार ना? हवे तर ब्लॉकचे पैसे देऊ आपण त्यांना!! असो.
पण तू खरेच कुठे गेला होतास? तुझ्या कचेरीतले लोक म्हणतात, की तुला पत्रकारांचा एड्‌स झालाय! - ऍक्वायर्ड इंटेलिजन्स डिफिशियन्सी सिंड्रोम!! माझ्या विसविशीत विसोबा, तुझ्याबाबतचे हे निदान तर मी मागेच केले होते! खरे तर मराठी पेपरांत हा रोग आता बराच पसरल्याचे दिसत आहे. या रोगाचे गावठी नाव "बनचुके' असे असल्याचे म्हणतात. सतत नव्या गोष्टींना नावे ठेवायची, नवे तंत्रज्ञान, नव्या पद्धती यांना नाके मुरडायची अशी काही या रोगाची लक्षणे आहेत. तुझ्या बोलण्यातून, लिहिण्यातून ती सहज दिसतात. नव्यातील चांगल्या गोष्टींचे स्वागत करायला जितक्‍या लवकर शिकाल, तितके बरे! नाही तर मग तुमचीच एक मोठी विसंगती होऊन जाते. आणि मग लोक तुम्हांला हसतात, तर तुम्हांला वाटते की तुमच्या विनोदांना हसतात! एड्‌समध्ये असेही भ्रम होतातच म्हणा!
माझ्या रागीट रेडक्‍या, तुला माझा राग तर नाही ना आला? रागावू नकोस रे! रागावलास, की तू सामनाच्या ले-आऊटसारखा दिसतोस! अरे, अलीकडे तू सामना पाहिलास का? राऊत साहेब रजेवर असून, भारतीताई त्याचे संपादन करीत आहेत, असे काहीसे झाले आहे काय? असो. मी रागावण्याबद्दल बोलत होते. तू माझ्यावर रागावणार नाहीस याची खात्री असल्यानेच खरे तर मी एवढे स्पष्ट लिहित आहे. अन्यथा मला काय अग्रलेख लिहिता येत नाहीत? अग्रलेख म्हणजे लोकसत्ताचे सोडून बरे का! नाही तर तुझा पारा एकदम चढायचा! तुम्ही केतकरी संप्रदायवाले ना!! पण माझ्या आगाऊ अडाण्या, तुम्ही केतकरांना आता सांगत का नाहीत, की त्यांचे अग्रलेख मुख्य अंकाबाहेर छापत जा म्हणून! कारण अलीकडे त्यांच्या अनेक अग्रलेखांचा आणि मुख्य अंकाचा जणू काही संबंधच नसतो! अग्रलेखातले संपादकीय धोरण वेगळे आणि बातम्यांतले वेगळे असे काही विचित्र चालले आहे. हवे तर याविषयी एकदा कक्काजींशीही बोलून घे! माझे, त्यांचे, श्रीकांतजींचे आणि शुभदाताई चौकरांचे मत अगदी सारखेच असेल!!
असो. खूपच लिहिले. एवढे वाचायचे म्हणजे तुला त्रासच! त्यातच काल गटारी होती. म्हणजे डोके अजून उतरले नसेल! "ती' उतरली तर "ते' उतरणार ना!! तेव्हा येथेच थांबते.
एकट्या तुझीच,
सही

आनंदी राहायला काय कराल....

कूठे गेले ते बालपण....

वास नाही ज्या फुलांना..............


वास नाही ज्या फुलांना फक्‍त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.

चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.

प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.

वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे

नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.

वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.

-बा. भ. बोरकर

Friday, August 10, 2007

पुणेरी मराठी........

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे. काही उदाहरणे देत आहोत .

पुणेकराकडून पुणेकरांसाठी

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks

............ .. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls

.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first

............ ... ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल .

Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client

............ ... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही .

Avoid speaking in regional languages within the office premises

............ .. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for

............ ... ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत. गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही .

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office

............ . शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries

............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.

पुरुषांची मैत्री.......

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
कसे ????
असे कसे विचारता ????

कसे ते पाहा.

एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 2० मैत्रिणींना फोन करतो.

ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.

aft 10 days..........

आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.

तेव्हा तो सांगतो "अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 2० मित्रांना फोन करते.

त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता.

and and and

उरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात !!! howzatttt!

पुरुषांच्या बायका......

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?

पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... " पुरे झाली तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ... " मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ... " थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ... " ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ... " गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... " केसाने गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको ... " दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ... " मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ... " कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... " नुसत्या पुड्या सोडु नका "
रेल्वे ड्रायव्हरची बायको.... " आली का गाडी रुळावर/लायनीवर ?"
संगणक अभियंत्याची बायको..... " तुला डिलीट करून टाकीन !"
डौक्टरची बायको..... " स्वत:ला काय भववान समजोतस का ?"

माज...


एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.

एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

... का?

...

...

...

अंगात मस्ती, दुसरं काय?

ह्या जगातील १० सत्ये

प्रेम.... दोन शब्द

नातं...........


या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अशी गोड तू....


अशी गोड तू....

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

ढगांनी झुलावे हळूवार आता तुझ्या अंगणी,
नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

दिल्या या मनाला सुगंधी सखे तू यातना,
व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

Tuesday, August 7, 2007

अक्षर गणपती











Monday, August 6, 2007

एका कॉल सेंटरची कहाणी...

Sunday, August 5, 2007

पलंग......

त्या वषीर् , पळसाच्या नग्न विखुरलेल्या फांद्यांवर पहिलं फूल उमललं तेव्हा आई धडधाकट होती , हां हां म्हणता म्हणता अख्ख्या झाडाचं जेव्हा धगधगतं जंगल झालं तेव्हा आई आजारी पडली होती आणि ज्या रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळी फुलं तुटून , झाडाच्या पायथ्याशी चिरडलेल्या लाल फुलांचा चिखल बनला होता , आई मरून गेली होती. आम्ही एका खोलीत रहात होतो. ती खोली कोंदटलेली , जुनी , ढलप्या उडालेली होती. खोलीला तीनच कोपरे होते. एका कोपऱ्यात मी , दुसऱ्या कोपऱ्यात आई आणि तिसऱ्या कोपऱ्यात एक मोठा पलंग होता , ज्यावर मी आईच्या सोबत झोपायचो. खोलीच्या आपापल्या कोपऱ्यांवर आमचा पूर्ण अधिकार होता. एका कोपऱ्यात आईनं आपलं साम्राज्य पसरवलेलं असायचं. एक लहानसा चौरंग... चौरंगावर तिचे देव... जुने पुराणे पत्र्याचे दोन डबे... दोन गाठोडी.... काही बरण्या.... काही जुने कपडे.... जपाच्या दोन माळा.... बॅटरी.... हातानं वारा घ्यायचा पंखा... काही जुनी नाणी आणि बरंच काही. माझ्या भागात काही विशेष नव्हतं. थोडी पुस्तकं... जुनं लाकडी कपाट... त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या... थोडे कपडे आणि माझ्या वाढलेल्या वयावर नेहमी पसरलेलं अदृश्य मौन... जवळजवळ उदासपणा आणि भकासपणाच्या मधली काहीशी स्थिती. छोट्याशा खिडकीजवळ तिसरा कोपरा होता. त्या कोपऱ्यातच तो मोठा पलंग होता जो सगळ्या खोलीवर आपल्या भव्यतेनं दडपण आणायचा. आईला हा पलंग रूखवतात मिळाला होता. आईला या पलंगाचा मोठा अभिमान असायचा. जुन्या जमान्यातला हा पलंग. एकेकाळी या पलंगावर आई वडिलांच्यासोबत झोपायची. आईचे निघून गेलेले कितीतरी दिवस त्या पलंगात गुंतलेले होते , जे रात्री तिच्या जवळपास जिवंत व्हायचे. अनेकदा

रात्री मी आईला हळूच त्या दिवसांशी गप्पा मारताना बघितलेलं होतं , ऐकलेलं होतं. अचानक उगीचच हसताना... रडताना आणि कधी कधी लाजतानासुद्धा बघितलेलं होतं. मला नेहमी वाटायचं की आई माझ्यापेक्षा त्या पलंगाच्या जास्त जवळ आहे. बऱ्याचदा ती जे मला सांगायची नाही , ते त्या पलंगासोबत चुपचाप वाटून घ्यायची.

सुट्ट्यांमधल्या दिवसात किंवा सकाळच्या फावल्या वेळात मी आईला नेहमी गुपचूपपणे पाहत रहायचो. ती सकाळी फार लवकर उठायची आणि तिची सगळी कामं उरकून घ्यायची , तिच्या वावरण्यानं माझी झोपमोड होऊ नये म्हणून फार प्रयत्न करायची. तिच्या हालचाली इतक्या नियंत्रित आणि निश्चिंत असायच्या की डोळे मिटलेले असले तरी मला कळायचं की आता ती काय करत असेल. आता स्वच्छता... आता कपडे धुणं.... जप करणं.... किंवा असंच काहीतरी. सकाळी उठून ती सगळ्यात आधी तिचा कोपरा स्वच्छ करायची... मग माझा.... मग आंघोळ करायची. आंघोळीसाठी तिला बराच वेळ लागायचा. स्वच्छतेच्या बाबतीत ती जवळजवळ विक्षिप्त आग्रही असायची.

प्रत्येक गोष्ट ती दोन-तीनदा स्वच्छ करायची. खोलीतली फरशी... भिंती... बादली... कपडे आणि स्वत:चं शरीरसुद्धा. स्वच्छता करता करता बऱ्याचदा ती बाहेर खोलीत यायची... काही विसरलेलं घेण्यासाठी नाही तर आतली स्वच्छता करता करता बाहेरचं काहीतरी स्वच्छ करायचं राहून गेलेलं आठवल्यामुळं. मी गप्प पडून तिला पाहायचो. तिची वाकलेली कंबर.... लोंबणाऱ्या सुरकुत्या.. आक्रसलेला चेहरा... आणि त्यावर सतत चिकटलेला एक शाश्वत संशय. बऱ्याचदा ती फक्त एका वस्त्रावर बाहेर येऊन हे सर्व करायची. स्वत:च्या विवस्त्र अवस्थेची तिला जवळजवळ खबरसुद्धा नसायची. त्यावेळी मी डोळे मिटून , तोंड फिरवून घ्यायचो.

आईची ही अवस्था माझ्या आत नेहमी एक विचित्र अशी किळस निर्माण करायची. मला वाटायचं की मी तिच्या अशा अव्यवस्थितपणाला आळा घालावा... आपला तिरस्कार व्यक्त करावा. पण मी तिला काही स्पष्ट सांगू शकत नव्हतो. कित्येक वर्षांपासून हा आईचा दिनक्रम होता. मला वाटायचं की मी काही सांगितलं तर ती अचानक इतकी ओशाळेल आणि अस्वस्थ होईल की तिच्या आयुष्याचा सगळा तोल नष्ट होऊन जाईल. जितक्या निवांत आणि निश्चिंतपणे ती जे करतेय ते सगळं विस्कटून जाईल. मी काही बोलायचो नाही तरीही माझी घृणा मी लपवू शकत नव्हतो. पलंगावरून उठल्यावर मी तिच्याशी काही बोलायचो नाही आणि तोंड वाईट करून बसायचो. ती भीतीनं आणि दु:खानं माझ्याकडं उशीरापर्यंत बघत बसायची. कधी धाडस करून विचारायची , ' काय झालं ?'

मी काही बोलायचो नाही. खाली मान घालून सिगरेट ओढत बसायचो. मला काही बोलावंसं वाटायचं नाही. एखादेवेळी मी काहीही बोललो तर ती उत्साहित व्हायची आणि मग भरपूर बोलत राहायची. हे बोलणं तिच्या आणि माझ्यातल्या मौन परंतु स्वीकृत परिस्थितीला अस्ताव्यस्त करून टाकायचं. माझ्या तणावानं भरलेल्या मौनामुळं तिच्या चेहऱ्यावरची वेदना आणि तिच्या आतली अस्वस्थता वाढायची.

' बरं वाटत नाही का ?' ती पुन्हा एकदा साहस करायची. मी कडवट बोलण्यासाठी मान वर करायचो पण तिच्या चेहऱ्यावरची कातरता आणि वयाची शिथिलता पाहून गप्प बसायचो. मी ' हो ' म्हणेन की काय या धागधुगीनं ती त्यावेळी खरंच थरथरत असायची... माझ्या कुठल्याही वेदनेच्या कल्पनेनं ती अशीच थरथर कापायची.

माझ्या अशा गप्प बसण्याचा ती काही तरी अंदाज काढायची. आई माझ्या आतलं सगळं कसं काय ओळखते हे मला कधीच कळलं नाही. मग ती सावध राहायची. त्या अवस्थेतून ती बऱ्याचदा बाहेर यायची नाही आणि आलीच तर असं समजून की मी अजून झोपेत आहे. पण हे निश्चित करण्यासाठी ती बहुधा उशीरापर्यंत दाराच्या आड उभं राहून मला गुपचूप पाहत राहायची.

एके दिवशी मी जरा जास्तच दारू प्यालो होती. कारण मला ज्या बाईबरोबर लग्न करावं वाटत होतं आणि जिला माझ्याबरोबर लग्न करावं वाटतं होतं , तिच्याशी माझं भांडण झालं होतं. तसं आम्ही फार दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होतो... इतक्या दिवसांपासून की माझ्यासारखीच ती सुद्धा हळूहळू थोराड होऊ लागली होती. एखादा केस पांढरा झाला होता आणि तिची छाती अगदीच सैल पडली होती. आता ती थकल्यामुळं प्रेमामध्ये संवेदनाशून्यतेच्या टोकापर्यंत निष्क्रिय राहू लागली होती. खोलीला चौथा कोपरा असता तर मी तिच्याशी लग्न केलं असतं. याच गोष्टीवरून ती माझ्याशी नेहमी भांडायची. तिचं म्हणणं होतं की , पलंग बाजूला काढून आपण त्या कोपऱ्यात राहू शकतो. पण मला हे माहिती होतं की आईसाठी हे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा मी पलंगाशिवाय आईचा विचार करायचो तेव्हा डोक्यात ढासळणाऱ्या घराचा विचार यायचा. आई जेव्हा माझ्यासोबत रात्री त्या पलंगावर झोपायची तेव्हाच ती तिच्या दिवसभराच्या स्तब्धतेतून... माझ्या एकांतातून... तिच्या डोळ्याच्या पांढऱ्या डोहातून... सुरकुत्यांमधून बाहेर येऊ शकायची. माझ्या तळहाताला स्पर्श करायची किंवा डोक्यावरून हात फिरवायची. मी अनभिज्ञ किंवा विमनस्क दिसण्याचा बहाणा करायचो. ती हळूहळू काहीतरी बोलत रहायची. त्या बोलण्यामध्येसुद्धा माझ्या काळज्या जास्त असायच्या. माझं वाढतं वय... माझा उतरायला लागलेला चेहरा... माझं एकटेपण. कधी कधी मी हसायचो , मग ती मला माझ्या ऐश्वर्यसंपन्न भूतकाळाबद्दल सांगू लागायची की , कशी ती याच पलंगावर झोपत असायची आणि जन्मल्यानंतरच मीसुद्धा याच पलंगावर याच ठिकाणी कसा झोपायचो. एका प्रकारे पलंग तिच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती होता.... असण्याची सार्थकता... अर्थवत्ता होता. पलंगावरच तिला माझी जवळीक मिळायची जी तिच्या उर्वरीत आयुष्यातलं उरलेलं , एकुलतं एक सुख होतं.

तसं आई त्या बाईला ओळखत होती. मी तिला बऱ्याचदा माझ्यासोबत खोलीवर घेऊन यायचो. ती आईला भेटायची. तिला बघून आईला खरोखरच आनंद व्हायचा. ' आई तिला तिच्या कोपऱ्यात बसवायची आणि मनसोक्त गप्पा मारायची... त्या सगळ्या गोष्टी तिला सांगायची ज्या तिनं एक तर रात्री पलंगाला सांगितलेल्या असायच्या नाहीतर मला न सांगितल्यामुळं स्वत:च्या आत साठवलेल्या असायच्या. आम्हा दोघांच्या संबंधांमुळं बहुतेक आईला स्वत:ला अपराध्यासारखं वाटत असायचं , त्या बाईशी जास्त गप्पा मारून , तिचं अधिक स्वागत करून ती हा अपराधीपणा दाबून टाकायची. मी माझ्या कोपऱ्यात बसून दोघींच्या गप्पा ऐकायचो आणि गुपचूप सिगरेट पीत मध्ये मध्ये हसायचो. माझ्या हसण्यानं आई खुलून जायची आणि माझ्याशी अधिकच बोलायची. मी उत्तर दिलं की , तिला फारच समाधान वाटायचं कारण ती गृहीत धरायची की मला काही झालेलं नाही , मी सुखी-समाधानी आहे आणि मी तिच्या अस्तित्वाला माझ्या आयुष्यात महत्त्वाचं मानतो. अचानकच तिला स्वत:ला आपण महत्त्वपूर्ण आहोत असं वाटू लागायचं आणि या भावनेनं ती माझ्यावर थोडा अधिकारसुद्धा गाजवू लागायची , जो मी अनिच्छेनंच गुपचूप सहन करत रहायचो. हळूहळू ही अवस्था मला असह्य होऊ लागायची. आई हे ओळखायची आणि शेजारच्या घरी निघून जायची. मी त्या बाईला घरी का आणतो ते तिला माहिती असायचं. तिला या गोष्टीची जाणीव होती की , आम्हाला एक दीर्घ एकांत पाहिजे असायचा. बऱ्या उशीरानं त्या बाईला घेऊन मी घराबाहेर पडायचो आणि आई तेव्हाच परत यायची.

तर त्या रात्री माझं त्या बाईशी भांडण झालं होतं. त्या रात्री थंडी थोडी जास्तच होती , इतकी की मी दारूच्या दुकानातच काही घोट आत ढकलले होते. उरलेली दारू घेऊन मी तिच्या घरी गेलो. माझ्या आत तिच्या शरीराची तीव्र इच्छा होत होती. ती तिच्या खोलीत झोपली होती. बहुतेक नुकतीच रडून झोपली असावी. तिच्या डोळ्यात चिपाड आलं होतं आणि तिच्या गालावर एक अश्ाू चिकटलेला होता. मी तिला माझ्यासोबत घरी चल म्हणालो. पण तिनं मला असं म्हणत धुडकावून लावलं की जोपर्यंत मी पलंग बाजूला हटवून तिला तिथं ठेवत नाही तोपर्यंत कधीच घरी येणार नाही. दारूची गमीर् आणि तिच्या शरीराच्या इच्छेनं पेटल्यानं मी हे सहन करू शकलो नाही. मी तिच्या ओठाला करकचून चावलो , तिचं अंग ओरबडलं आणि तिला तिरस्कारानं ढकलून परत आलो.

घरी येऊन पलंगावर पडलो , आई जागीच होती , ती हळूच जवळ आली. दारूच्या वासानं तिचं तोंड वाईट झालं. ' तू जास्त प्यायला लागलायस ', ती हळूच पुटपुटली , ' सकाळपर्यंत वास येत असतो. ' मी डोळे उघडून तिच्याकडं पहिलं. तिच्या सुरकुत्या आणि पांढरे डोळे माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होते. मला ती आवडली. तिचा चेहरा ममत्वानं आणि दयेनं चमकत होता. तिच्या आतली वेदना तिच्या चेहऱ्यावर उतरली होती. तिनं हळूच माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्या पिकलेल्या शरीराला नीट पाहिलं.

' ती नीच आहे ', मी बडबडलो , ' तू झोप. '

आई कण्हत उठली आणि पलंगाच्या दुसऱ्या भागावर जाऊन झोपली.

जास्त प्याल्यामुळं मी त्या रात्री झोपलो नाही. दोनदा उलटी झाली. छाती चोळत बसलो. त्या रात्री मी आईला लक्षपूर्वक पाहिलं. फार म्हातारी झाली होती ती. केस एकदम पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जंगल होतं. गाल आत बसले होते. झोपताना तिचं बोळकं झालेलं तोंड थोडं उघडं होतं , तोंडातून फार बारीक , विचित्र असा आवाज येत होता. मी उशीरापर्यंत तिला पाहत राहिलो. खरोखर ती जगातली एकमेव बाई होती जी माझ्यावर प्रेम करत होती. ती मला फार पवित्र वाटली.

त्या रात्री झोपलोच नाही. आई रोजच्याप्रमाणं अंधार असतानाच लवकर उठली होती. आईनं रोजच्यासारखी स्वच्छता केली , आत गेली आणि आंघोळ करू लागली. मग अचानक काही तरी घेण्यासाठी ती बाहेर आली. मी त्याच क्षणी आईला पाहिलं. मी आश्चर्यचकित झालो , मग एकदम ओरडलो , ती संपूर्ण विवस्त्र होती. तिला अजिबात जाणीव नव्हती की मी जागा आहे. मी सगळ्या ताकदीनिशी पलंगावरून उतरलो आणि तिला बाहेर ढकलू लागलो. ' चालती हो बाहेर.... चल अशीच जा ', मी वेड्यासारखे मानेला झटके देत होतो. आईनं मला एकवार पाहिलं आणि माझ्या चेहऱ्यावरची घृणा पाहून त्याच क्षणी मेल्याहून मेल्यासारखी झाली. ती माझ्यासमोर अगदी नग्न उभी होती , सुकलेल्या त्वचेमधल्या हाडाच्या सापळ्यासारखी , रिकाम्या पांढऱ्याफटक डोळ्यांनी काही वेळ बघत राहिली , मग एकदम माझ्या पायावर कोसळली. तिनं माझे दोन्ही पाय गच्च धरले. ती गयावया करत होती , ' एकदा... फक्त एकदा माफ कर. '

तिनं मान वर केली. तरी रडत होती. तिचा चेहरा केविलवाणा झाला होता... संपूर्णपणे पराभूत अगतिकता तिच्या चेहऱ्यावर पसरलेली होती. मनुष्याच्या आत्म्यातलं सगळं सत्व वाळून खट्ट झाल्यानंतर उत्पन्न व्हावी तशी क्षमायाचना. सगळं नितांत पारदर्शक होतं. तिची ग्लानी... भीती... ओशाळलेपण आणि दयनीयता. मी तिला तिरस्कारानं ढकललं आणि बाहेर चालता झालो. थेट त्या बाईच्या घरी गेलो आणि तिला सांगितलं की आपण लवकरच लग्नं करणार आहोत.

त्या दिवशी पळसाच्या नग्न , विखुरलेल्या फांद्यांवर पहिलं फूल उमललं होतं.

त्या दिवसानंतर आई राख झाल्यासारखी झाली. एकदम गप्प. तिच्या कोपऱ्यात ती अधिकच आक्रसून गेली होती. आता पहिल्यासारखं व्याकूळ नजरेनं पाहणं नाही. नजर भिडवणं नाही. तिचा चेहरा काळवंडला होता. मी खोलीत असलो तर ती अधिकच घाबरलेली असायची. मान खाली घालून , काही न बोलता , हळूहळू काहीतरी करत बसायची. दहशत बसल्यासारखी... एखाद्या अनिष्ट शंकेनं भयभीत होऊन... आपल्या अस्तित्वाला कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न करत. तिचा स्वत:वरचा विश्वास पूर्णत: उडून गेला होता. माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवायची आणि काहीही विचारायची नाही. भूतकाळातल्या कशाचीही आठवण करून द्यायची नाही. पलंगाच्या एका भागात अंग चोरून पडलेली असायची. तिनं आता बहुतेक पलंगाशी गप्पा मारणंसुद्धा सोडून दिलं होतं. आता मला तिचं रात्री पुटपुटणं किंवा हसणंसुद्धा ऐकू यायचं नाही. तिच्या आत सगळं मेल्यासारखं झालं होतं. बहुधा पलंगसुद्धा.

त्याच दिवसांमध्ये पळसावर लाल जंगल खदखदायला सुरुवात झाली होती आणि आईसुद्धा आजारी पडली होती.

त्या रात्री फार मुसळधार पाऊस पडू लागला होता. मी संध्याकाळपासूनच प्यायला सुरुवात केली होती. आई पलंगावर चादर पांघरून घेऊन गप्प पडली होती. आपल्या जागेवर अंग अगदी मुडपून घेऊन. मी तिच्याजवळ जाऊन अंग टाकलं. काहीतरी फार त्रास होत असल्यासारखा ती दीर्घ श्वास घेत होती. मी उठून बसलो. तिला पाहिलं. फार दिवसांनंतर मी तिला लक्षपूर्वक बघत होतो. तिच्या सुरकुत्या फारच दाट झाल्या होत्या. मी तिला हळूच हात लावला. त्या दिवसानंतर पहिल्यांदाच. तिचं अंग थोडंसं थरथरलं. मग माझ्याकडं तोंड वळवलं. थोडा वेळ मला पहात राहिली मग पुटपुटली , ' तू फारच अशक्त झाला आहेस. म्हातारा झाल्यासारखा दिसतोयस. '

मी तिला पाहत राहिलो मग हळूच म्हणालो , ' मी लग्न करतोय. ' ती काही म्हणाली नाही. ' तिच्याबरोबरच... ती सुद्धा म्हातारी होऊ लागलीय. '

ती मला तशीच पाहात राहिली. तिनं काही विचारलं नाही पण तिच्या डोळ्यात प्रश्न होता , संशयसुद्धा. ' ती इथंच राहिल... आम्ही पलंग इथून बाजूला हटवू. ' मी थरथरत म्हणालो.

आई काही म्हणाली नाही. तिनं हळूच डोळे मिटले. त्याच रात्री आई मरून गेली.

आईच्या माघारी तो कोपरा रिकामा झाला. आम्ही तिचं सगळं सामान तिथून काढून टाकलं. तिचे पत्र्याचे डबे... गाठोडी , हातपंखा , बॅटरी , देव , जपाच्या माळा... सगळं बांधून वर ठेवून टाकलं. आईच्या कोपऱ्यात तिनं स्वत:चं सामान ठेवलं. आईची कुठलीच निशाणी आता उरली नव्हती. आई आता कुठंच नव्हती.

रात्री ती माझ्यासोबत पलंगावर झोपली. आई झोपायची त्याच जागी. ती प्रचंड खुष होती. खळखळून हसत तिनं माझं नाक चावलं आणि कपडे उतरवून विवस्त्र झाली. मी मान वळवून पलंगावर पसरलेल्या तिच्या नग्न शरीराकडे पाहिलं आणि एकदम किंचाळलो. आई तिथंच होती.

प्रियंवद
अनुवाद : बलवंत जेऊरकर
मटा सांस्कृतिक
Maharashtra Times

जो शब्द.....


जो शब्द तू उच्चारला नाहीस कधीच माझ्यासाठी
त्याचे दार मी वाजवतेय.
कधीतरी मी लिहू शकेन त्यातूनच अशी एखादी कविता
जी पोचेल थेट तुझ्याआत...
तुझ्या हृदयातल्या छिदात राहील माझा एकुलता शब्द.
तोवर तशीच भटकत राहीन मी हताश ओळींमधून
तुझा ठाव शोधत.
कारण , कुठलीही नवी वाट बनवत नेली जंगलातून
तरी दरवेळी पुढे एक अवचित कडा लागतो
आणि खाली खोल दरी...
निमूट परतते मी पुन:पुन्हा स्वत:जवळ.
तुझ्यापर्यंत पोचण्याच्या गच्च इच्छेत माझे पाय
बुटांतल्या पायांसारखे आक्रसून लहानच राहिलेत
झिजताहेत इच्छांचे तळवे आणि टोचत राहतात खडेकाटे
तरीही फेकता येत नाहीत काढून.
हे सारे तुला सांगावे की नाही , कळत नाही.
खरेतर , मला कळत नाही व्याकरण तुझ्या भाषेचे
तरीही उच्चारते शब्द जोडत वेडीकुडी वाक्ये
अधिकच हास्यास्पद बनत जाते कदाचित
त्यामुळेही तुझ्या नजरेत.
मी पाहिलं नाहीये तुला कधीच कविता वाचताना
तू कधीच कवितेने असा संपूर्ण बनलेला
दिसलाच नाहीयेस मला.
आणि तरीही आता सारं लिहिणं थांबवून
मी तुझ्यासाठी एक कविता विणू इच्छिते...
ऐन हिवाळ्यात लाभलेल्या
उबदार उन्हाच्या तुकड्यासारखी ,
जिच्यात चमकत राहील
पानगळीनंतरची तांबूस कोवळी पालवी.
तुझ्या ठाम निश्चयी शब्दाच्या कणखर शरीरावर
निदान एक तलम कोवळ्या नक्षीची उबदार कविता
जी लपेटून मिळू शकेल तुला
रात्री दिशादर्शक नक्षत्रांच्या सावलीत
गहिऱ्या स्वप्नांनी दाटून आलेली सुखद झोप
आणि पुन्हा पहाटेला
नवा हिरवाकंच ओलेता उत्साह अथक वाटचालीसाठी
कवितेसह वा कवितेशिवाय.

हा गांव.......


हा गांव
जिथे कुणालाच ऐकू येत नाहीय
जिथे कुणालाच दिसत नाहीय
जिथे कुणालाच बोलताही येत नाहीय
म्हणजे
ऐकणे ,
दिसणे ,
बोलणे , सारे र्वज्य केले आहे त्याने
सारांश , साऱ्या जगण्यालाच
लायक झाला आहे आता गांव!

घेत जावे, देत जावे.....

देणा-याने देत जावे;

घेणा-याने घेत जावे.


हिरव्यापिवळ्या माळावरुन

हिरवीपिवळी शाल घ्यावी;

सह्याद्रीच्या कड्याकडून

छातीसाठी ढाल घ्यावी.


वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे;

रक्तांमधल्या प्रश्नांसाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून

पिसाळलेली आयाळ घ्यावी;

भरलेल्याशा भीमेकडून

तुकोबाची माळ घ्यावी.


देणा-याने देत जावे;

घेणा-याने घेत जावे;

घेता घेता एक दिवस

देणा-याचे हात घ्यावे!
~~~~~~~~~~~~~~~~
-विंदा करंदीकर

चिऊताई दार उघड !


दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !

गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !

फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !

बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
-मंगेश पाडगावकर

कांही चारोळ्या........

एकदा मला ना

तू माझी वाट पहाताना पहायचंय

तेवढ्यासाठी आडोशाला

हळूच लपून रहायचंय

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं

तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.

मरण ही चाट पडलं म्हणालं

काय हा मनुष्य आहे ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात,

अन प्रत्येकाचं दार बंद आहे

तरी एकोप्यावर बोलणं हा

प्रत्येकाचा छंद आहे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घराभोवती कुंपण हवं

म्हणजे आपलं जग ठरवता येतं

बाहेर बरबटलेलं असलं तरी

आपल्यापूरतं सावरता येतं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तू बुडताना मी

तुझ्याकडे धावलो ते

मदतीला नव्हे सोबतीला,

नाहीतर... मला तरी कूठे येतय पोहायला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आठवतय तुला आपलं

एका छत्रीतून जाणं

ओंघळणारे थेंब आपण

निथळताना पहाणं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या प्रत्येक क्षणात

तुझा वाटा अर्धा आहे

भूतकाळ आठवायचा तर

तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आठवणींच्या देशात

मी मनाला कधी पाठवत नाही

जाताना ते खुष असतं

पण येताना त्याला येववत नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- चंद्रशेखर गोखले यांच्या "मी माझा"

ऐलमा पैलमा......


ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवे घुमती बुरजावरी
गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवि निघा, तेवि निघा, कांडा तीळ, बाई तांदुळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया खातील का दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी, आयुष्य दे बा वनमाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येताजाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंगणी, आळव्या तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्षं
अतूला मतूला चरणी घातुला, चरणीचे सोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एक एक गोंडा विसाविसाचा
साडे नांगर नेसायाचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
वरीस वर्ष पावल्यांनो.

आमुचा राजा..........


शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
विहिरीमधे सात कमळे
एक एक कमळ तोडिलं
भवानी मातेला अर्पण केलं
भवानी माता प्रसन्न झाली
शिवाजी राजाला तलवार दिली
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला

Saturday, August 4, 2007

एक प्रेयसी पाहिजे....

Friday, August 3, 2007

दोन भावंड......


दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी
-मनोगता वरून

अजुनही.....

अमृताचे थेंब...........

एकट असावं....

Thursday, August 2, 2007

दुर्गा पुजा : कोलकता, भारत

करार.....


हरवला आहे............