Sunday, August 19, 2007

तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

मटण कैसा किलो ? मटण कैसा किलो ? हाताची दाही बोटे मटणवाल्यापुढे सतत नाचवत भाउंनी विचारले. दाही बोटात चांगल्या सोन्याच्या घसघसीत अंगठया होत्या. या वैभवाच्या अती प्रदर्शनाने दुकानदार चांगलाच वैतागला.

मटण सौ रुपय्या किलो, सौ रुपय्या किलो, आपली संपुर्ण बत्तीसी विस्कारुन, दुकानदाराने भाव सांगितला. त्याचे बत्तीस ही दात सोन्याचे होते. झाले दोघांची लग्गालग्गी, गुद्दादुद्दी सुरु झाली. भांडण सरपंच बाई पर्यंत पोहोचले. दोघांचे म्हणणे ऐकल्या नंतर बाईंनी आपला फैसला सुनावला.

मान उजवीकडे वळवुन भाऊरावांकडे बघुन त्या म्हणाल्या तुम्हारा ही बराबर. मग हळुवारपणे मान डावी कडे वळवुन मटणवाल्याला म्हणल्या तुम्हाराभी बराबर.

सरपंचबाईच्या कानात भल्यामोठाल्या हिऱ्याच्या कुडी होत्या.

सध्या महाराष्टात दोन राजकीय पक्षातील युती तोडण्या / रहाण्या वरुन होण्याऱ्या कुरबुरीवरुन ,युक्तीवादाबद्द्ल ही असेच म्हणावेसे वाटते. तुम्हाराही बराबर, और तुम्हाराभी बराबर

आम्हांस आलेले (प्रेम)पत्रक...


माझ्या खवचट खेचरा,
गेले चार-पाच दिवस तू कोठे उलथला होतास? माझा फोनही घेत नव्हतास! स्वतःला उद्धव ठाकरे समजतोस की काय? लक्षात ठेव, आपली युती अशी नाही तोडू देणार मी! गेल्याच महिन्यात वडाच्या फांदीला फेऱ्या मारून तुला सात जन्म मागून घेतला आहे. या महिन्यातही बरीच व्रते-उद्यापने, उपासतापास येतात. ते "सकाळ'मध्ये साग्रसंगीत येईलच. त्यानुसार सर्व काही यथासांग करण्याचे मी ठरविलेच आहे. तेव्हा तुझी सुटका नाही!!
माझ्या उचलखोर उचापत्या, "सकाळ'मध्ये यंदा श्रावण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहेत. तेव्हा "सकाळ'वाले "व्रत'स्थ महिलांचे, मंगळागौर जागविणाऱ्या भगिनींचे, उपवास करणाऱ्या पुरंध्रींचे फोटो छापणार आहेत काय, याचीही जरा चौकशी करून ठेव. छापणार असतील, तर नऊवारी साडीची सोय आताच करून ठेवलेली बरी. तुला आठवते? गेल्यावर्षी आपण दोघे मिळून अख्खे हिंदमाता फिरलो, तरी नऊवारी मिळाली नव्हती. तेव्हा मटामध्ये फोटो छापून येत होते! यंदा तरी तू माझा फोटो पेपरात छापून आणणार ना? हवे तर ब्लॉकचे पैसे देऊ आपण त्यांना!! असो.
पण तू खरेच कुठे गेला होतास? तुझ्या कचेरीतले लोक म्हणतात, की तुला पत्रकारांचा एड्‌स झालाय! - ऍक्वायर्ड इंटेलिजन्स डिफिशियन्सी सिंड्रोम!! माझ्या विसविशीत विसोबा, तुझ्याबाबतचे हे निदान तर मी मागेच केले होते! खरे तर मराठी पेपरांत हा रोग आता बराच पसरल्याचे दिसत आहे. या रोगाचे गावठी नाव "बनचुके' असे असल्याचे म्हणतात. सतत नव्या गोष्टींना नावे ठेवायची, नवे तंत्रज्ञान, नव्या पद्धती यांना नाके मुरडायची अशी काही या रोगाची लक्षणे आहेत. तुझ्या बोलण्यातून, लिहिण्यातून ती सहज दिसतात. नव्यातील चांगल्या गोष्टींचे स्वागत करायला जितक्‍या लवकर शिकाल, तितके बरे! नाही तर मग तुमचीच एक मोठी विसंगती होऊन जाते. आणि मग लोक तुम्हांला हसतात, तर तुम्हांला वाटते की तुमच्या विनोदांना हसतात! एड्‌समध्ये असेही भ्रम होतातच म्हणा!
माझ्या रागीट रेडक्‍या, तुला माझा राग तर नाही ना आला? रागावू नकोस रे! रागावलास, की तू सामनाच्या ले-आऊटसारखा दिसतोस! अरे, अलीकडे तू सामना पाहिलास का? राऊत साहेब रजेवर असून, भारतीताई त्याचे संपादन करीत आहेत, असे काहीसे झाले आहे काय? असो. मी रागावण्याबद्दल बोलत होते. तू माझ्यावर रागावणार नाहीस याची खात्री असल्यानेच खरे तर मी एवढे स्पष्ट लिहित आहे. अन्यथा मला काय अग्रलेख लिहिता येत नाहीत? अग्रलेख म्हणजे लोकसत्ताचे सोडून बरे का! नाही तर तुझा पारा एकदम चढायचा! तुम्ही केतकरी संप्रदायवाले ना!! पण माझ्या आगाऊ अडाण्या, तुम्ही केतकरांना आता सांगत का नाहीत, की त्यांचे अग्रलेख मुख्य अंकाबाहेर छापत जा म्हणून! कारण अलीकडे त्यांच्या अनेक अग्रलेखांचा आणि मुख्य अंकाचा जणू काही संबंधच नसतो! अग्रलेखातले संपादकीय धोरण वेगळे आणि बातम्यांतले वेगळे असे काही विचित्र चालले आहे. हवे तर याविषयी एकदा कक्काजींशीही बोलून घे! माझे, त्यांचे, श्रीकांतजींचे आणि शुभदाताई चौकरांचे मत अगदी सारखेच असेल!!
असो. खूपच लिहिले. एवढे वाचायचे म्हणजे तुला त्रासच! त्यातच काल गटारी होती. म्हणजे डोके अजून उतरले नसेल! "ती' उतरली तर "ते' उतरणार ना!! तेव्हा येथेच थांबते.
एकट्या तुझीच,
सही

आनंदी राहायला काय कराल....

कूठे गेले ते बालपण....

वास नाही ज्या फुलांना..............


वास नाही ज्या फुलांना फक्‍त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.

चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.

प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.

वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे

नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.

वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.

-बा. भ. बोरकर

Friday, August 10, 2007

पुणेरी मराठी........

पुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे. काही उदाहरणे देत आहोत .

पुणेकराकडून पुणेकरांसाठी

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks

............ .. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls

.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first

............ ... ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल .

Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client

............ ... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही .

Avoid speaking in regional languages within the office premises

............ .. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette buds only into ash pans provided for

............ ... ही जागा तुमधे तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडी चा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत. गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही .

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office

............ . शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries

............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.

पुरुषांची मैत्री.......

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
कसे ????
असे कसे विचारता ????

कसे ते पाहा.

एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 2० मैत्रिणींना फोन करतो.

ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.

aft 10 days..........

आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.
दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.

तेव्हा तो सांगतो "अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 2० मित्रांना फोन करते.

त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता.

and and and

उरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात !!! howzatttt!

पुरुषांच्या बायका......

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?

पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... " पुरे झाली तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ... " मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ... " थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ... " ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ... " गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... " केसाने गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको ... " दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ... " मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ... " कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... " नुसत्या पुड्या सोडु नका "
रेल्वे ड्रायव्हरची बायको.... " आली का गाडी रुळावर/लायनीवर ?"
संगणक अभियंत्याची बायको..... " तुला डिलीट करून टाकीन !"
डौक्टरची बायको..... " स्वत:ला काय भववान समजोतस का ?"

माज...


एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.

एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

... का?

...

...

...

अंगात मस्ती, दुसरं काय?

ह्या जगातील १० सत्ये

प्रेम.... दोन शब्द

नातं...........


या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अशी गोड तू....


अशी गोड तू....

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

ढगांनी झुलावे हळूवार आता तुझ्या अंगणी,
नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

दिल्या या मनाला सुगंधी सखे तू यातना,
व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

Tuesday, August 7, 2007

अक्षर गणपती











Monday, August 6, 2007

एका कॉल सेंटरची कहाणी...

Sunday, August 5, 2007

पलंग......

त्या वषीर् , पळसाच्या नग्न विखुरलेल्या फांद्यांवर पहिलं फूल उमललं तेव्हा आई धडधाकट होती , हां हां म्हणता म्हणता अख्ख्या झाडाचं जेव्हा धगधगतं जंगल झालं तेव्हा आई आजारी पडली होती आणि ज्या रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळी फुलं तुटून , झाडाच्या पायथ्याशी चिरडलेल्या लाल फुलांचा चिखल बनला होता , आई मरून गेली होती. आम्ही एका खोलीत रहात होतो. ती खोली कोंदटलेली , जुनी , ढलप्या उडालेली होती. खोलीला तीनच कोपरे होते. एका कोपऱ्यात मी , दुसऱ्या कोपऱ्यात आई आणि तिसऱ्या कोपऱ्यात एक मोठा पलंग होता , ज्यावर मी आईच्या सोबत झोपायचो. खोलीच्या आपापल्या कोपऱ्यांवर आमचा पूर्ण अधिकार होता. एका कोपऱ्यात आईनं आपलं साम्राज्य पसरवलेलं असायचं. एक लहानसा चौरंग... चौरंगावर तिचे देव... जुने पुराणे पत्र्याचे दोन डबे... दोन गाठोडी.... काही बरण्या.... काही जुने कपडे.... जपाच्या दोन माळा.... बॅटरी.... हातानं वारा घ्यायचा पंखा... काही जुनी नाणी आणि बरंच काही. माझ्या भागात काही विशेष नव्हतं. थोडी पुस्तकं... जुनं लाकडी कपाट... त्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या... थोडे कपडे आणि माझ्या वाढलेल्या वयावर नेहमी पसरलेलं अदृश्य मौन... जवळजवळ उदासपणा आणि भकासपणाच्या मधली काहीशी स्थिती. छोट्याशा खिडकीजवळ तिसरा कोपरा होता. त्या कोपऱ्यातच तो मोठा पलंग होता जो सगळ्या खोलीवर आपल्या भव्यतेनं दडपण आणायचा. आईला हा पलंग रूखवतात मिळाला होता. आईला या पलंगाचा मोठा अभिमान असायचा. जुन्या जमान्यातला हा पलंग. एकेकाळी या पलंगावर आई वडिलांच्यासोबत झोपायची. आईचे निघून गेलेले कितीतरी दिवस त्या पलंगात गुंतलेले होते , जे रात्री तिच्या जवळपास जिवंत व्हायचे. अनेकदा

रात्री मी आईला हळूच त्या दिवसांशी गप्पा मारताना बघितलेलं होतं , ऐकलेलं होतं. अचानक उगीचच हसताना... रडताना आणि कधी कधी लाजतानासुद्धा बघितलेलं होतं. मला नेहमी वाटायचं की आई माझ्यापेक्षा त्या पलंगाच्या जास्त जवळ आहे. बऱ्याचदा ती जे मला सांगायची नाही , ते त्या पलंगासोबत चुपचाप वाटून घ्यायची.

सुट्ट्यांमधल्या दिवसात किंवा सकाळच्या फावल्या वेळात मी आईला नेहमी गुपचूपपणे पाहत रहायचो. ती सकाळी फार लवकर उठायची आणि तिची सगळी कामं उरकून घ्यायची , तिच्या वावरण्यानं माझी झोपमोड होऊ नये म्हणून फार प्रयत्न करायची. तिच्या हालचाली इतक्या नियंत्रित आणि निश्चिंत असायच्या की डोळे मिटलेले असले तरी मला कळायचं की आता ती काय करत असेल. आता स्वच्छता... आता कपडे धुणं.... जप करणं.... किंवा असंच काहीतरी. सकाळी उठून ती सगळ्यात आधी तिचा कोपरा स्वच्छ करायची... मग माझा.... मग आंघोळ करायची. आंघोळीसाठी तिला बराच वेळ लागायचा. स्वच्छतेच्या बाबतीत ती जवळजवळ विक्षिप्त आग्रही असायची.

प्रत्येक गोष्ट ती दोन-तीनदा स्वच्छ करायची. खोलीतली फरशी... भिंती... बादली... कपडे आणि स्वत:चं शरीरसुद्धा. स्वच्छता करता करता बऱ्याचदा ती बाहेर खोलीत यायची... काही विसरलेलं घेण्यासाठी नाही तर आतली स्वच्छता करता करता बाहेरचं काहीतरी स्वच्छ करायचं राहून गेलेलं आठवल्यामुळं. मी गप्प पडून तिला पाहायचो. तिची वाकलेली कंबर.... लोंबणाऱ्या सुरकुत्या.. आक्रसलेला चेहरा... आणि त्यावर सतत चिकटलेला एक शाश्वत संशय. बऱ्याचदा ती फक्त एका वस्त्रावर बाहेर येऊन हे सर्व करायची. स्वत:च्या विवस्त्र अवस्थेची तिला जवळजवळ खबरसुद्धा नसायची. त्यावेळी मी डोळे मिटून , तोंड फिरवून घ्यायचो.

आईची ही अवस्था माझ्या आत नेहमी एक विचित्र अशी किळस निर्माण करायची. मला वाटायचं की मी तिच्या अशा अव्यवस्थितपणाला आळा घालावा... आपला तिरस्कार व्यक्त करावा. पण मी तिला काही स्पष्ट सांगू शकत नव्हतो. कित्येक वर्षांपासून हा आईचा दिनक्रम होता. मला वाटायचं की मी काही सांगितलं तर ती अचानक इतकी ओशाळेल आणि अस्वस्थ होईल की तिच्या आयुष्याचा सगळा तोल नष्ट होऊन जाईल. जितक्या निवांत आणि निश्चिंतपणे ती जे करतेय ते सगळं विस्कटून जाईल. मी काही बोलायचो नाही तरीही माझी घृणा मी लपवू शकत नव्हतो. पलंगावरून उठल्यावर मी तिच्याशी काही बोलायचो नाही आणि तोंड वाईट करून बसायचो. ती भीतीनं आणि दु:खानं माझ्याकडं उशीरापर्यंत बघत बसायची. कधी धाडस करून विचारायची , ' काय झालं ?'

मी काही बोलायचो नाही. खाली मान घालून सिगरेट ओढत बसायचो. मला काही बोलावंसं वाटायचं नाही. एखादेवेळी मी काहीही बोललो तर ती उत्साहित व्हायची आणि मग भरपूर बोलत राहायची. हे बोलणं तिच्या आणि माझ्यातल्या मौन परंतु स्वीकृत परिस्थितीला अस्ताव्यस्त करून टाकायचं. माझ्या तणावानं भरलेल्या मौनामुळं तिच्या चेहऱ्यावरची वेदना आणि तिच्या आतली अस्वस्थता वाढायची.

' बरं वाटत नाही का ?' ती पुन्हा एकदा साहस करायची. मी कडवट बोलण्यासाठी मान वर करायचो पण तिच्या चेहऱ्यावरची कातरता आणि वयाची शिथिलता पाहून गप्प बसायचो. मी ' हो ' म्हणेन की काय या धागधुगीनं ती त्यावेळी खरंच थरथरत असायची... माझ्या कुठल्याही वेदनेच्या कल्पनेनं ती अशीच थरथर कापायची.

माझ्या अशा गप्प बसण्याचा ती काही तरी अंदाज काढायची. आई माझ्या आतलं सगळं कसं काय ओळखते हे मला कधीच कळलं नाही. मग ती सावध राहायची. त्या अवस्थेतून ती बऱ्याचदा बाहेर यायची नाही आणि आलीच तर असं समजून की मी अजून झोपेत आहे. पण हे निश्चित करण्यासाठी ती बहुधा उशीरापर्यंत दाराच्या आड उभं राहून मला गुपचूप पाहत राहायची.

एके दिवशी मी जरा जास्तच दारू प्यालो होती. कारण मला ज्या बाईबरोबर लग्न करावं वाटत होतं आणि जिला माझ्याबरोबर लग्न करावं वाटतं होतं , तिच्याशी माझं भांडण झालं होतं. तसं आम्ही फार दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होतो... इतक्या दिवसांपासून की माझ्यासारखीच ती सुद्धा हळूहळू थोराड होऊ लागली होती. एखादा केस पांढरा झाला होता आणि तिची छाती अगदीच सैल पडली होती. आता ती थकल्यामुळं प्रेमामध्ये संवेदनाशून्यतेच्या टोकापर्यंत निष्क्रिय राहू लागली होती. खोलीला चौथा कोपरा असता तर मी तिच्याशी लग्न केलं असतं. याच गोष्टीवरून ती माझ्याशी नेहमी भांडायची. तिचं म्हणणं होतं की , पलंग बाजूला काढून आपण त्या कोपऱ्यात राहू शकतो. पण मला हे माहिती होतं की आईसाठी हे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा मी पलंगाशिवाय आईचा विचार करायचो तेव्हा डोक्यात ढासळणाऱ्या घराचा विचार यायचा. आई जेव्हा माझ्यासोबत रात्री त्या पलंगावर झोपायची तेव्हाच ती तिच्या दिवसभराच्या स्तब्धतेतून... माझ्या एकांतातून... तिच्या डोळ्याच्या पांढऱ्या डोहातून... सुरकुत्यांमधून बाहेर येऊ शकायची. माझ्या तळहाताला स्पर्श करायची किंवा डोक्यावरून हात फिरवायची. मी अनभिज्ञ किंवा विमनस्क दिसण्याचा बहाणा करायचो. ती हळूहळू काहीतरी बोलत रहायची. त्या बोलण्यामध्येसुद्धा माझ्या काळज्या जास्त असायच्या. माझं वाढतं वय... माझा उतरायला लागलेला चेहरा... माझं एकटेपण. कधी कधी मी हसायचो , मग ती मला माझ्या ऐश्वर्यसंपन्न भूतकाळाबद्दल सांगू लागायची की , कशी ती याच पलंगावर झोपत असायची आणि जन्मल्यानंतरच मीसुद्धा याच पलंगावर याच ठिकाणी कसा झोपायचो. एका प्रकारे पलंग तिच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती होता.... असण्याची सार्थकता... अर्थवत्ता होता. पलंगावरच तिला माझी जवळीक मिळायची जी तिच्या उर्वरीत आयुष्यातलं उरलेलं , एकुलतं एक सुख होतं.

तसं आई त्या बाईला ओळखत होती. मी तिला बऱ्याचदा माझ्यासोबत खोलीवर घेऊन यायचो. ती आईला भेटायची. तिला बघून आईला खरोखरच आनंद व्हायचा. ' आई तिला तिच्या कोपऱ्यात बसवायची आणि मनसोक्त गप्पा मारायची... त्या सगळ्या गोष्टी तिला सांगायची ज्या तिनं एक तर रात्री पलंगाला सांगितलेल्या असायच्या नाहीतर मला न सांगितल्यामुळं स्वत:च्या आत साठवलेल्या असायच्या. आम्हा दोघांच्या संबंधांमुळं बहुतेक आईला स्वत:ला अपराध्यासारखं वाटत असायचं , त्या बाईशी जास्त गप्पा मारून , तिचं अधिक स्वागत करून ती हा अपराधीपणा दाबून टाकायची. मी माझ्या कोपऱ्यात बसून दोघींच्या गप्पा ऐकायचो आणि गुपचूप सिगरेट पीत मध्ये मध्ये हसायचो. माझ्या हसण्यानं आई खुलून जायची आणि माझ्याशी अधिकच बोलायची. मी उत्तर दिलं की , तिला फारच समाधान वाटायचं कारण ती गृहीत धरायची की मला काही झालेलं नाही , मी सुखी-समाधानी आहे आणि मी तिच्या अस्तित्वाला माझ्या आयुष्यात महत्त्वाचं मानतो. अचानकच तिला स्वत:ला आपण महत्त्वपूर्ण आहोत असं वाटू लागायचं आणि या भावनेनं ती माझ्यावर थोडा अधिकारसुद्धा गाजवू लागायची , जो मी अनिच्छेनंच गुपचूप सहन करत रहायचो. हळूहळू ही अवस्था मला असह्य होऊ लागायची. आई हे ओळखायची आणि शेजारच्या घरी निघून जायची. मी त्या बाईला घरी का आणतो ते तिला माहिती असायचं. तिला या गोष्टीची जाणीव होती की , आम्हाला एक दीर्घ एकांत पाहिजे असायचा. बऱ्या उशीरानं त्या बाईला घेऊन मी घराबाहेर पडायचो आणि आई तेव्हाच परत यायची.

तर त्या रात्री माझं त्या बाईशी भांडण झालं होतं. त्या रात्री थंडी थोडी जास्तच होती , इतकी की मी दारूच्या दुकानातच काही घोट आत ढकलले होते. उरलेली दारू घेऊन मी तिच्या घरी गेलो. माझ्या आत तिच्या शरीराची तीव्र इच्छा होत होती. ती तिच्या खोलीत झोपली होती. बहुतेक नुकतीच रडून झोपली असावी. तिच्या डोळ्यात चिपाड आलं होतं आणि तिच्या गालावर एक अश्ाू चिकटलेला होता. मी तिला माझ्यासोबत घरी चल म्हणालो. पण तिनं मला असं म्हणत धुडकावून लावलं की जोपर्यंत मी पलंग बाजूला हटवून तिला तिथं ठेवत नाही तोपर्यंत कधीच घरी येणार नाही. दारूची गमीर् आणि तिच्या शरीराच्या इच्छेनं पेटल्यानं मी हे सहन करू शकलो नाही. मी तिच्या ओठाला करकचून चावलो , तिचं अंग ओरबडलं आणि तिला तिरस्कारानं ढकलून परत आलो.

घरी येऊन पलंगावर पडलो , आई जागीच होती , ती हळूच जवळ आली. दारूच्या वासानं तिचं तोंड वाईट झालं. ' तू जास्त प्यायला लागलायस ', ती हळूच पुटपुटली , ' सकाळपर्यंत वास येत असतो. ' मी डोळे उघडून तिच्याकडं पहिलं. तिच्या सुरकुत्या आणि पांढरे डोळे माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होते. मला ती आवडली. तिचा चेहरा ममत्वानं आणि दयेनं चमकत होता. तिच्या आतली वेदना तिच्या चेहऱ्यावर उतरली होती. तिनं हळूच माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्या पिकलेल्या शरीराला नीट पाहिलं.

' ती नीच आहे ', मी बडबडलो , ' तू झोप. '

आई कण्हत उठली आणि पलंगाच्या दुसऱ्या भागावर जाऊन झोपली.

जास्त प्याल्यामुळं मी त्या रात्री झोपलो नाही. दोनदा उलटी झाली. छाती चोळत बसलो. त्या रात्री मी आईला लक्षपूर्वक पाहिलं. फार म्हातारी झाली होती ती. केस एकदम पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जंगल होतं. गाल आत बसले होते. झोपताना तिचं बोळकं झालेलं तोंड थोडं उघडं होतं , तोंडातून फार बारीक , विचित्र असा आवाज येत होता. मी उशीरापर्यंत तिला पाहत राहिलो. खरोखर ती जगातली एकमेव बाई होती जी माझ्यावर प्रेम करत होती. ती मला फार पवित्र वाटली.

त्या रात्री झोपलोच नाही. आई रोजच्याप्रमाणं अंधार असतानाच लवकर उठली होती. आईनं रोजच्यासारखी स्वच्छता केली , आत गेली आणि आंघोळ करू लागली. मग अचानक काही तरी घेण्यासाठी ती बाहेर आली. मी त्याच क्षणी आईला पाहिलं. मी आश्चर्यचकित झालो , मग एकदम ओरडलो , ती संपूर्ण विवस्त्र होती. तिला अजिबात जाणीव नव्हती की मी जागा आहे. मी सगळ्या ताकदीनिशी पलंगावरून उतरलो आणि तिला बाहेर ढकलू लागलो. ' चालती हो बाहेर.... चल अशीच जा ', मी वेड्यासारखे मानेला झटके देत होतो. आईनं मला एकवार पाहिलं आणि माझ्या चेहऱ्यावरची घृणा पाहून त्याच क्षणी मेल्याहून मेल्यासारखी झाली. ती माझ्यासमोर अगदी नग्न उभी होती , सुकलेल्या त्वचेमधल्या हाडाच्या सापळ्यासारखी , रिकाम्या पांढऱ्याफटक डोळ्यांनी काही वेळ बघत राहिली , मग एकदम माझ्या पायावर कोसळली. तिनं माझे दोन्ही पाय गच्च धरले. ती गयावया करत होती , ' एकदा... फक्त एकदा माफ कर. '

तिनं मान वर केली. तरी रडत होती. तिचा चेहरा केविलवाणा झाला होता... संपूर्णपणे पराभूत अगतिकता तिच्या चेहऱ्यावर पसरलेली होती. मनुष्याच्या आत्म्यातलं सगळं सत्व वाळून खट्ट झाल्यानंतर उत्पन्न व्हावी तशी क्षमायाचना. सगळं नितांत पारदर्शक होतं. तिची ग्लानी... भीती... ओशाळलेपण आणि दयनीयता. मी तिला तिरस्कारानं ढकललं आणि बाहेर चालता झालो. थेट त्या बाईच्या घरी गेलो आणि तिला सांगितलं की आपण लवकरच लग्नं करणार आहोत.

त्या दिवशी पळसाच्या नग्न , विखुरलेल्या फांद्यांवर पहिलं फूल उमललं होतं.

त्या दिवसानंतर आई राख झाल्यासारखी झाली. एकदम गप्प. तिच्या कोपऱ्यात ती अधिकच आक्रसून गेली होती. आता पहिल्यासारखं व्याकूळ नजरेनं पाहणं नाही. नजर भिडवणं नाही. तिचा चेहरा काळवंडला होता. मी खोलीत असलो तर ती अधिकच घाबरलेली असायची. मान खाली घालून , काही न बोलता , हळूहळू काहीतरी करत बसायची. दहशत बसल्यासारखी... एखाद्या अनिष्ट शंकेनं भयभीत होऊन... आपल्या अस्तित्वाला कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न करत. तिचा स्वत:वरचा विश्वास पूर्णत: उडून गेला होता. माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवायची आणि काहीही विचारायची नाही. भूतकाळातल्या कशाचीही आठवण करून द्यायची नाही. पलंगाच्या एका भागात अंग चोरून पडलेली असायची. तिनं आता बहुतेक पलंगाशी गप्पा मारणंसुद्धा सोडून दिलं होतं. आता मला तिचं रात्री पुटपुटणं किंवा हसणंसुद्धा ऐकू यायचं नाही. तिच्या आत सगळं मेल्यासारखं झालं होतं. बहुधा पलंगसुद्धा.

त्याच दिवसांमध्ये पळसावर लाल जंगल खदखदायला सुरुवात झाली होती आणि आईसुद्धा आजारी पडली होती.

त्या रात्री फार मुसळधार पाऊस पडू लागला होता. मी संध्याकाळपासूनच प्यायला सुरुवात केली होती. आई पलंगावर चादर पांघरून घेऊन गप्प पडली होती. आपल्या जागेवर अंग अगदी मुडपून घेऊन. मी तिच्याजवळ जाऊन अंग टाकलं. काहीतरी फार त्रास होत असल्यासारखा ती दीर्घ श्वास घेत होती. मी उठून बसलो. तिला पाहिलं. फार दिवसांनंतर मी तिला लक्षपूर्वक बघत होतो. तिच्या सुरकुत्या फारच दाट झाल्या होत्या. मी तिला हळूच हात लावला. त्या दिवसानंतर पहिल्यांदाच. तिचं अंग थोडंसं थरथरलं. मग माझ्याकडं तोंड वळवलं. थोडा वेळ मला पहात राहिली मग पुटपुटली , ' तू फारच अशक्त झाला आहेस. म्हातारा झाल्यासारखा दिसतोयस. '

मी तिला पाहत राहिलो मग हळूच म्हणालो , ' मी लग्न करतोय. ' ती काही म्हणाली नाही. ' तिच्याबरोबरच... ती सुद्धा म्हातारी होऊ लागलीय. '

ती मला तशीच पाहात राहिली. तिनं काही विचारलं नाही पण तिच्या डोळ्यात प्रश्न होता , संशयसुद्धा. ' ती इथंच राहिल... आम्ही पलंग इथून बाजूला हटवू. ' मी थरथरत म्हणालो.

आई काही म्हणाली नाही. तिनं हळूच डोळे मिटले. त्याच रात्री आई मरून गेली.

आईच्या माघारी तो कोपरा रिकामा झाला. आम्ही तिचं सगळं सामान तिथून काढून टाकलं. तिचे पत्र्याचे डबे... गाठोडी , हातपंखा , बॅटरी , देव , जपाच्या माळा... सगळं बांधून वर ठेवून टाकलं. आईच्या कोपऱ्यात तिनं स्वत:चं सामान ठेवलं. आईची कुठलीच निशाणी आता उरली नव्हती. आई आता कुठंच नव्हती.

रात्री ती माझ्यासोबत पलंगावर झोपली. आई झोपायची त्याच जागी. ती प्रचंड खुष होती. खळखळून हसत तिनं माझं नाक चावलं आणि कपडे उतरवून विवस्त्र झाली. मी मान वळवून पलंगावर पसरलेल्या तिच्या नग्न शरीराकडे पाहिलं आणि एकदम किंचाळलो. आई तिथंच होती.

प्रियंवद
अनुवाद : बलवंत जेऊरकर
मटा सांस्कृतिक
Maharashtra Times

जो शब्द.....


जो शब्द तू उच्चारला नाहीस कधीच माझ्यासाठी
त्याचे दार मी वाजवतेय.
कधीतरी मी लिहू शकेन त्यातूनच अशी एखादी कविता
जी पोचेल थेट तुझ्याआत...
तुझ्या हृदयातल्या छिदात राहील माझा एकुलता शब्द.
तोवर तशीच भटकत राहीन मी हताश ओळींमधून
तुझा ठाव शोधत.
कारण , कुठलीही नवी वाट बनवत नेली जंगलातून
तरी दरवेळी पुढे एक अवचित कडा लागतो
आणि खाली खोल दरी...
निमूट परतते मी पुन:पुन्हा स्वत:जवळ.
तुझ्यापर्यंत पोचण्याच्या गच्च इच्छेत माझे पाय
बुटांतल्या पायांसारखे आक्रसून लहानच राहिलेत
झिजताहेत इच्छांचे तळवे आणि टोचत राहतात खडेकाटे
तरीही फेकता येत नाहीत काढून.
हे सारे तुला सांगावे की नाही , कळत नाही.
खरेतर , मला कळत नाही व्याकरण तुझ्या भाषेचे
तरीही उच्चारते शब्द जोडत वेडीकुडी वाक्ये
अधिकच हास्यास्पद बनत जाते कदाचित
त्यामुळेही तुझ्या नजरेत.
मी पाहिलं नाहीये तुला कधीच कविता वाचताना
तू कधीच कवितेने असा संपूर्ण बनलेला
दिसलाच नाहीयेस मला.
आणि तरीही आता सारं लिहिणं थांबवून
मी तुझ्यासाठी एक कविता विणू इच्छिते...
ऐन हिवाळ्यात लाभलेल्या
उबदार उन्हाच्या तुकड्यासारखी ,
जिच्यात चमकत राहील
पानगळीनंतरची तांबूस कोवळी पालवी.
तुझ्या ठाम निश्चयी शब्दाच्या कणखर शरीरावर
निदान एक तलम कोवळ्या नक्षीची उबदार कविता
जी लपेटून मिळू शकेल तुला
रात्री दिशादर्शक नक्षत्रांच्या सावलीत
गहिऱ्या स्वप्नांनी दाटून आलेली सुखद झोप
आणि पुन्हा पहाटेला
नवा हिरवाकंच ओलेता उत्साह अथक वाटचालीसाठी
कवितेसह वा कवितेशिवाय.

हा गांव.......


हा गांव
जिथे कुणालाच ऐकू येत नाहीय
जिथे कुणालाच दिसत नाहीय
जिथे कुणालाच बोलताही येत नाहीय
म्हणजे
ऐकणे ,
दिसणे ,
बोलणे , सारे र्वज्य केले आहे त्याने
सारांश , साऱ्या जगण्यालाच
लायक झाला आहे आता गांव!

घेत जावे, देत जावे.....

देणा-याने देत जावे;

घेणा-याने घेत जावे.


हिरव्यापिवळ्या माळावरुन

हिरवीपिवळी शाल घ्यावी;

सह्याद्रीच्या कड्याकडून

छातीसाठी ढाल घ्यावी.


वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे;

रक्तांमधल्या प्रश्नांसाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून

पिसाळलेली आयाळ घ्यावी;

भरलेल्याशा भीमेकडून

तुकोबाची माळ घ्यावी.


देणा-याने देत जावे;

घेणा-याने घेत जावे;

घेता घेता एक दिवस

देणा-याचे हात घ्यावे!
~~~~~~~~~~~~~~~~
-विंदा करंदीकर

चिऊताई दार उघड !


दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो,
तसे फाटे असतात !

गाणा~या मैना असतात ;
पांढरे शुभ्र बगळे असतात ;
कधी कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात !

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं !

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुध्दा आपल्याला
होत असतं पारखं !

मोर धुन्द नाचतो म्हणुन
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकीळ सुंदर गातो म्हणुन
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फुल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मुल असतं !

फुलणा~या या फुलासाठी,
खेळणा~या या मुलासाठी

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळी मधे
काहीसुध्दा घडत नाही !
आपलं दार बंद म्हणुन
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करु लागतो !
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो !

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं !
चिऊताई ,चिऊताई,
तुला काहीच कळलं नाही !
तुझं घर बंद होतं,
डोळे असुन अंध होतं !

बंद घरात बसुन कसं चालेल?
जगावरती रुसुन कसं चालेल?

दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
-मंगेश पाडगावकर

कांही चारोळ्या........

एकदा मला ना

तू माझी वाट पहाताना पहायचंय

तेवढ्यासाठी आडोशाला

हळूच लपून रहायचंय

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं

तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.

मरण ही चाट पडलं म्हणालं

काय हा मनुष्य आहे ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात,

अन प्रत्येकाचं दार बंद आहे

तरी एकोप्यावर बोलणं हा

प्रत्येकाचा छंद आहे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घराभोवती कुंपण हवं

म्हणजे आपलं जग ठरवता येतं

बाहेर बरबटलेलं असलं तरी

आपल्यापूरतं सावरता येतं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तू बुडताना मी

तुझ्याकडे धावलो ते

मदतीला नव्हे सोबतीला,

नाहीतर... मला तरी कूठे येतय पोहायला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आठवतय तुला आपलं

एका छत्रीतून जाणं

ओंघळणारे थेंब आपण

निथळताना पहाणं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या प्रत्येक क्षणात

तुझा वाटा अर्धा आहे

भूतकाळ आठवायचा तर

तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आठवणींच्या देशात

मी मनाला कधी पाठवत नाही

जाताना ते खुष असतं

पण येताना त्याला येववत नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- चंद्रशेखर गोखले यांच्या "मी माझा"

ऐलमा पैलमा......


ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवे घुमती बुरजावरी
गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवि निघा, तेवि निघा, कांडा तीळ, बाई तांदुळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया खातील का दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी, आयुष्य दे बा वनमाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येताजाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंगणी, आळव्या तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्षं
अतूला मतूला चरणी घातुला, चरणीचे सोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एक एक गोंडा विसाविसाचा
साडे नांगर नेसायाचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
वरीस वर्ष पावल्यांनो.

आमुचा राजा..........


शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
विहिरीमधे सात कमळे
एक एक कमळ तोडिलं
भवानी मातेला अर्पण केलं
भवानी माता प्रसन्न झाली
शिवाजी राजाला तलवार दिली
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला

Saturday, August 4, 2007

एक प्रेयसी पाहिजे....

Friday, August 3, 2007

दोन भावंड......


दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी
-मनोगता वरून

अजुनही.....

अमृताचे थेंब...........

एकट असावं....

Thursday, August 2, 2007

दुर्गा पुजा : कोलकता, भारत

करार.....


हरवला आहे............


तुझं आणि माझं जमेल का तसे....


पारिजात............


जगण नक्की काय असत ?


जगण नक्की काय असत ?
हेलकावणार्या लाटान्वरच ते एक जहाज असत
ते ज्याच त्यानेच वल्व्हायच असत
किनारा येइपर्यत माग वळून मात्र पहायच नसत
जगण नक्की काय असत ?
ताज टवटवीत गुलाबाच फ़ुल जणू एक असत
त्याच्या रुपाने मोहित व्हायच असत
काट्यांकडे पाहून मात्र नाक मुरडायच नसत
जगण नक्की काय असत ?
सतत गुंतत जाणार ते एक कोड असत
ते ज्याच त्याने सोड्वायच असत
गुंतून मात्र त्यात पडायच नसत
जगण नक्की काय असत ?
तलाम रेशमी जणू वस्त्र असत
ते ज्याच त्यानच विणायच असत
मात्र अति ताणायच नसत....

आधार..........

Wednesday, August 1, 2007

आयुष्य...हे असंच असतं......


आयुष्य...हे असंच असतं.????
कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं.????

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????

चेहऱ्यामागचे सौंदर्य...........


वाचायला येउ लागले तेव्हापासून मी सतत वाचतेच आहे. लहानपणी बालगोष्टी, किशोर, चांदोबा......जे हाती लागेल ते संपवूनच खाली ठेवायचे. वाचनाचे वेड खूप लोकांना असतेच.अगदी पुडीच्या कागदावर लिहिलेलेही वाचले जाते. कधीकधी त्यावर कुणाचे मन थांबलेले सापडते. वाचनवेडे मान्य करतील की हे वाढत जाणारे वेड आहे. वेगवेगळ्या वयात वाचनाचे प्रकार बदलतात, अर्थही बदलतात. माझाही वाचनप्रवास वेग घेत होता. बालगोष्टी मागे पडल्या होत्या. किशोरवयात पदार्पण केले होते. अनेक नवीन भाव आकार घेत होते. योगिनी जोगळेकर, भालचंद्र नेमाडे, सुहास शिरवळकर, वपु.....हे आवडू लागले. काहिसे हुरहूर लावणारे, स्वप्नात नेणारे लिखाण भावत होते. अशातच उदयचे ( लेखकाचे लोकांना माहित असलेले नांव लिहिलेले नाही, उदय हे त्याचे काही खास लोकांनाच माहित असलेले नाव आहे. ) लिखाण वाचायला मिळाले. बारा-तेरा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. ओघवत्या, भारावून टाकणाऱ्या कादंबऱ्या. मी एकामागोमाग एक वाचितच सुटले होते. पाहता पाहता उदयच्या लिखाणाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. त्याच्या धुमसत्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, प्रेमासाठी आसुसलेल्या पात्रांच्या व्यक्तित्वाने, भन्नाट लेखनशैलीमुळे माझ्या मनाने त्याचे रुप रेखाटले होते. अमिताभचा जंजिर येउन गेलेला होता. दिवार,जमीर सारखे सिनेमे गाजत होते. त्याच्या सगळ्या लिखाणातून तोही असाच डॅशिंग, रफटफ पण मनात मात्र हळवा असणार ह्यात काही शंकाच नव्हती. तशातच त्याच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत मला त्याचा पत्ता मिळाला. त्यात त्याच्या जन्मतारखेचा उल्लेख होता. त्यावेळी त्याची तिशी उलटून गेली होती. घर,संसार व लेखनप्रपंच ह्यात दंग असलेला एक प्रभावी लेखक. लेखक कसा दिसतो हे पाहण्याचा मला मोह झाला... वाढदिवस नजरेच्या टप्प्यात आला होता. जराही वेळ न दवडता मी त्याला पत्र लिहिले. वाचून झालेल्या कादंबऱ्या आवडल्या आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे असेही लिहिले. त्याआधी घरातील आपली माणसे वगळता मी कोणालाही पत्र लिहिले नव्हते. त्यामुळे असे अनोळखी माणसाला पत्र लिहिताना मोठे साहसच केले होते. माझ्या ह्या खुळेपणाला घरातले सगळे हसत होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला उत्तर येईल असे एकदाही वाटले नव्हते. पोस्टमन येइ त्यावेळी मी शाळेत असे. घरी आल्या आल्या मी आईला विचारी, पत्र आलेय का? आई गालातल्या गालात हसून नाही म्हणे. असा महिना उलटला. मुळातच आशा नव्हती त्यात इतके दिवस उलटल्यावर ......एके दिवशी घरी आले तर आई हातात निळ्या रंगाचे आतंर्देशीय पत्र घेऊन उभी. माझा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. पत्रात त्याने सामान्यपणे सगळे लेखक जे लिहितील तेच लिहिले होते. प्रकाशकाना भेटण्यासाठी मुंबईत येणे होतेच तेव्हा नक्की भेटू. आमचा पत्रव्यवहार वाढू लागला. दहावीचा अभ्यास जोर धरु लागला होता. अवांतर वाचनासाठी वेळ कमी पडत होता. दरम्यान त्याची आणिक एक कादंबरी प्रकाशित झाली. पत्रात त्याने मुंबईस येत असल्याचे कळविले. मी वेळ झाल्यास आमच्या घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले.त्याने ते स्विकारले.

अखेरीस तो दिवस उजाडला. त्याची सगळी कामे आटोपून रात्री आठ वाजता तो आमच्या घरी आला. दार मीच उघडले. आणि ई.....ऽऽऽ अशी अस्फुट किंकाळी उमटली. ति कशीबशी दाबून मी त्याचे स्वागत केले. थोडावेळ तो बसला, नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी त्याने मला भेट दिली. चहा घेऊन तो गेला. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. माझ्या मनात रेखाटलेल्या त्याच्या मूर्तीचा चक्काचूर झाला होता. एक अतिशय सर्वसामान्य व्यक्तित्व.काहीसे कुरुपातच जमा होणारे. पाच फूट जेमतेम उंची, फाटकी शरीरयष्टी, निस्तेज उदास चेहरा, अर्धवट वाढलेली खुरटी दाढी आणि ह्या सगळ्याला न शोभणारा मोठ्ठा गॉगल. धक्का ओसरल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या तोंडून अगदी लहान आवाजात उमटलेली किंकाळी त्याच्या कानाना अचुक एकू गेली होती. दूर्दैव माझे.

ह्या घटनेवर त्याने चुकूनही भाष्य केले नाही. आमचा पत्रव्यवहार अखंड चालू होता. त्यातून हळुहळु मला तो अगदी एकटा असल्याचे जाणवले होते. जीवनाकडून फारश्या अपेक्शा नसणारा साधासुधा पण खूप हळवा, टोकाचा मनस्वी होता. त्याच्या घरच्या लोकांनि त्याच्याशी संबध ठेवला नव्हता. आताशा तो पेणला राहात होता.माझे कॉलेज-कॅरमच्या मॅचेस, इतर छोटेमोठे कोर्सेस ह्यात मी गुंतून गेले असले तरी त्याच्या जीवनातला एकमेव कोवळा तंतू मी असल्याची जाणीव मला झालेली होती. त्याने कधीही हे मला दर्शविले नाही आणि मीही नाही. मी त्याला उदयदा म्हणत असे. ते नाते त्याने मान्य केले होतेच. काळ पुढे सरकत होता. माझे लग्न झाले. त्याला येणे जमले नाही. पण त्याचे पत्र आले. माझ्या नवऱ्याची त्याची भेट आधीच झालेली होती. पत्रात खूप शुभेच्छा देऊन आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मला जाणे जमले नाही. ह्या दरम्यान पत्रे चालूच होती. त्यावरून तो ठीक असल्याचे मला कळत होते, म्हणजे तशी माझी समजूत होती. माझ्या बाळाला पहायला तो आला. अतिशय खंगला होता. त्याला पाहून मला भडभडून आले. माझे अश्रू पाहून तो कासावीस झाला. सारे काही छान चालले आहे ह्याची ग्वाही देत राहिला.

लेखनातला पूर्वीचा जोम कमी झाला होता. स्वत:चे माणूस नाही,असह्य एकटेपणा, पैशाची चणचण हे सारे त्याचा जीवनरस शोषित होते. एके दिवशी न राहवून मी आणि नवरा अचानक त्याचेघरी गेलो. तो घरात नव्हता. कोणितरी ओळखीच्या मुलाने त्याला आम्ही आल्याचे कळविले. तसा पळतच तो आला. आज इतक्या वर्षांनी माझे घर उजळून निघाले असे पुन्हा पुन्हा म्हणत राहिला. आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेले. भरभरुन गप्पा मारल्या. त्याच्या सिगरेटस फार वाढल्याचे मला चांगलेच जाणवले, तसे मी बोलूनही दाखवले. त्यावर हसत हसत म्हणाला, "आजकल ये बेजुबानही जान है हमारी, बस इसे हमसे मत छिनों यारों/ कुछही सासें है बाकी,बस उन्हें जी भरके जीने दो प्यारों/" आम्ही त्याचा निरोप घेतला. बस सुटताना त्याचे भरुन आलेले डोळे, त्याची व्याकुळता मला काहितरी सांगू पहात होती. नेमके काय ते मला समजत नव्हते.मी त्याला विचारलेही. त्यावर अग् तुझे सुख पाहून मीही सुखावलोय. तेच डोळ्यांतून झरतेय.असे म्हणाला. त्यातील फसवेपणा मला विषण्ण करुन गेला.

काळ जातच होता. पत्रे चालूच होती. मी माझ्या परीने त्याला उत्साह देत होते, लिहिण्यासाठी प्रवृत्त करीत होते. दोन वर्षानंतर त्याची नविन कादंबरी आली. मनापासून लिहिली होती, प्रतिसादही चांगला होता. वाटले आता हा उभारी धरेल. पण तोवर उशीर झाला होता. माझ्या पत्रांना लागलीच उत्तर देणाऱ्या उदयचे महिनाभरात पत्र आले नाही. अचानक त्याचे प्रकाशक माझ्याघरी आले आणि उदयदा गेल्याचे सांगितले. केवळ मला त्रास होऊ नये म्हणून त्याने माझ्यापासून अनेक गोष्टी लपविल्या होत्या. त्याच्या शरीराने दगा द्यायला कधीचीच सुरवात केली होती. पैशाच्या अडचणिनेही कोंडित पकडले होते. खूप उधारी साचली. खानावळ वाल्याने त्यासाठी चारचोघात वाभाडे काढलेन्. ते न सोसून त्याच रात्री हृदयविकाराच्या पहिल्याच झटक्याने उदयला ह्या सगळ्यातून कायमचे सोडवले. माझ्यावर मनापासून निरपेक्ष प्रेम करणारा माझा उदयदा एका क्षणात मला पोरके करुन निघून गेला होता. त्याच्या काळजीच्या काट्याने माझ्यावर चरा उमटू नये हा त्याचा प्रयत्न मला आयुष्याचे वैफल्य देउन गेला. त्याच्या कुरूप चेहऱ्यामागचे नि:खळ सौंदर्य माझ्यात सामावून गेलेय. कुठल्याही नात्याचे आखीवरेखीव बंध नसलेला उदयदा माझ्या अंतरात अव्याहत आपुलकीचा आनंद गंध उधळतो आहे।
हा लेख इथून घेतला आहे : http://manogat.com